राज्यातील शेतकरी सध्या दुहेरी संकटात सापडले आहेत. एकीकडे कर्जाचे ओझे आणि दुसरीकडे अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेले नुकसान, यामुळे बळीराजा मोठ्या अडचणीत आहे. याच पार्श्वभूमीवर, शेतकरी कर्जमाफी कधी होणार या प्रश्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. माजी आमदार बच्चू कडू यांनीही या मागणीसाठी अनेक आंदोलने केली आहेत.
आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांना याविषयी विचारले असता त्यांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली. “शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा आमच्या जाहीरनाम्यात होता. आता आम्ही ‘लाडकी बहीण’ योजना आणि वीजमाफीवर काम करत आहोत. योग्य वेळ आल्यावर कर्जमाफीचा निर्णय नक्कीच घेतला जाईल,” असे अजित पवार म्हणाले.
पत्रकारांनी ‘योग्य वेळ कधी येणार?’ असे विचारल्यावर, “योग्य वेळ आल्यावर आम्हीच तुम्हाला सांगू ना,” असे उत्तर त्यांनी दिले. राज्यात सरकार चालवताना सर्व गोष्टींचा विचार करूनच पाऊले टाकावी लागतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गणेशोत्सव आणि इतर महत्त्वाचे निर्णय:
शेतकऱ्यांच्या प्रश्नासोबतच अजित पवारांनी इतर काही महत्त्वाच्या घोषणाही केल्या:
- गणेशोत्सव: गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यंदा अधिक उत्साहात साजरा होईल. गणेशोत्सवादरम्यान मेट्रो सकाळी ६ ते रात्री २ वाजेपर्यंत सुरू राहील आणि शेवटच्या दिवशी पूर्ण दिवस चालू राहील.
- पुरंदर विमानतळ: पुरंदर येथील विमानतळासाठी राज्य सरकारने निर्णय घेतला असून, ज्यांची घरे भूसंपादनात जात आहेत, त्यांना योग्य मोबदला दिला जाईल.
- पावसाची स्थिती: राज्यात पावसाची स्थिती नियंत्रणात असून, शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.