Crop Insurance List 2025: केंद्र सरकारने पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या योजनेचा पहिला हप्ता म्हणून ३,२०० कोटी रुपये सोमवार, ११ ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत. लवकरच उर्वरित ८,००० कोटी रुपयांचे वितरणही केले जाईल, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे.
पिक विम्याचा पहिला हप्ता जारी
हा पहिला हप्ता सुमारे ३० लाख शेतकऱ्यांसाठी असून, यामध्ये खरीप २०२२ पासून ते २०२४ पर्यंतच्या थकित भरपाईचा समावेश आहे. कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही घोषणा केली. ते म्हणाले, “ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात आज निधी जमा झाला नाही, त्यांनी काळजी करू नये. उर्वरित ८ हजार कोटी रुपये लवकरच जारी केले जातील.”
या रकमेचे वितरण राजस्थानमधील झुंझुनू येथे आयोजित एका कार्यक्रमात केले जाणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय कृषीमंत्री आणि राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा उपस्थित राहणार आहेत.
विमा कंपन्यांना कठोर इशारा
यावेळी, कृषिमंत्री चौहान यांनी विमा कंपन्यांना स्पष्टपणे सांगितले आहे की, जर त्यांनी शेतकऱ्यांना निर्धारित वेळेत नुकसान भरपाई दिली नाही, तर त्यांना १२ टक्के व्याजासह दंड भरावा लागेल. हे व्याज थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाईल. या कठोर भूमिकेमुळे शेतकऱ्यांना वेळेवर मदत मिळण्याची खात्री दिली आहे.
पंतप्रधान पिक विमा योजना २०१६ मध्ये सुरु करण्यात आली असून, गारपीट, पूर, दुष्काळ, अवकाळी पाऊस अशा नैसर्गिक आपत्त्यांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. २०२५-२६ पर्यंत या योजनेसाठी ६९ हजार ५१५.७१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.