Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’ या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या अर्जांची छाननी सध्या सुरु करण्यात आलेली आहे. शासनाने या योजनेत काही नवीन अटी आणि नियम लागू केले आहेत, ज्यामुळे अनेक अर्ज अपात्र ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या नव्या नियमांमुळे कोणत्या महिलांचे हप्ते थांबवले जाऊ शकतात, ते आपण सविस्तर पाहूयात.
लाडकी बहीण योजनेच्या नवीन अटी
१. वयाची अट: ‘नारी शक्ती दूत ॲप’ वापरून अर्ज करणाऱ्या महिलांसाठी १ जुलै २०२४ पर्यंत २१ वर्षे पूर्ण असणे अनिवार्य आहे, तर वेब पोर्टलवरून अर्ज करणाऱ्या महिलांसाठी ही अट ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत २१ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. या अटींची पूर्तता न करणाऱ्या महिला अपात्र ठरतील.
२. जन्मतारीख पडताळणी: अर्जासोबत सादर केलेल्या कागदपत्रांवरील (उदा. आधार कार्ड) जन्मतारीख आणि इतर माहिती समान असणे गरजेचे आहे. माहिती जुळत नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
३. वय ६५ वर्षांपेक्षा जास्त: १ ऑगस्ट २०२५ पर्यंत ज्या महिलांचे वय ६५ वर्षांपेक्षा अधिक असेल, त्यांना या योजनेतून वगळले जाईल.
४. शिधापत्रिकेची मर्यादा: एकाच शिधापत्रिकेवर (रेशन कार्ड) केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेऊ शकतात. एकाच कुटुंबातील दोन विवाहित महिला (उदा. सासू आणि सून) या योजनेचा लाभ घेत असल्यास, त्यापैकी फक्त एकच पात्र मानली जाईल.
५. एकाच कुटुंबातील दोन बहिणी: जर एकाच कुटुंबातील दोन बहिणींनी या योजनेसाठी अर्ज केला असेल, तर त्यापैकी एक अर्ज अपात्र घोषित केला जाईल.
६. शिधापत्रिकेतील बदल: योजनेचा लाभ सुरू झाल्यानंतर शिधापत्रिकेत कोणताही बदल केल्यास, जुने शिधापत्रिकाच वैध मानले जाईल.
७. राज्याबाहेरील महिला: योजनेच्या नियमांनुसार, महाराष्ट्राबाहेरील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. अशा स्थलांतरित लाभार्थ्यांची तपासणी एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांमार्फत केली जाईल, जेणेकरून योजनेचा गैरवापर टाळता येईल.