पुणे येथील कृषी हवामानशास्त्रज्ञ रामचंद्र साबळे यांनी महाराष्ट्रातील पावसाच्या पुढील आठवड्यातील स्थितीबद्दल महत्त्वाचा अंदाज वर्तवला आहेत. त्यांच्या मते, राज्यात १६ ऑगस्टपासून पावसाचे प्रमाण वाढणार असून, विदर्भ आणि मराठवाड्यासह चारही विभागांत जोरदार पाऊस अपेक्षित आहेत.
पावसाची सविस्तर स्थिती
रामचंद्र साबळे यांनी हवेच्या दाबानुसार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. १५ ऑगस्ट रोजी हवेचा दाब १००४ ते १००६ हेक्टोपास्कल राहील, पण १६ ऑगस्ट रोजी तो १००२ ते १००४ हेक्टोपास्कलपर्यंत खाली उतरेल, ज्यामुळे पावसाला सुरुवात होईल.
- उत्तर महाराष्ट्र: नाशिक आणि जळगावमध्ये ५ ते १२ मि.मी. हलका पाऊस, तर धुळे आणि नंदुरबारमध्ये २ ते ६ मि.मी. अतिशय हलका पाऊस अपेक्षित आहे.
- मराठवाडा: धाराशिव आणि लातूरमध्ये १० ते २५ मि.मी. हलका ते मध्यम पाऊस पडेल. नांदेडमध्ये ८ ते ४० मि.मी. पाऊस अपेक्षित आहे. हिंगोली, परभणी, जालना आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये ५ ते १५ मि.मी. हलका पाऊस पडू शकतो.
- विदर्भ: बुलढाणा, अकोला, वाशिम आणि अमरावतीमध्ये ४५ ते ९० मि.मी. पाऊस होईल. यवतमाळ, वर्धा, नागपूरमध्ये ४२ ते ९० मि.मी. मुसळधार पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदियामध्ये ४५ ते ८० मि.मी., तर चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये ७५ ते १३० मि.मी. मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल.
- पश्चिम महाराष्ट्र: कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात ३ ते ३० मि.मी. हलका ते मध्यम, सोलापूरमध्ये ९ ते ३५ मि.मी., पुण्यात १० ते २० मि.मी. हलका ते मध्यम, तर अहमदनगरमध्ये १० ते १३ मि.मी. पाऊस पडेल.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला
साबळे यांनी विशेषतः विदर्भातील शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. जोरदार पावसामुळे शेतात पाणी साचण्याची शक्यता असल्याने, ते तात्काळ काढून टाकावे. तसेच, अनेक शेतकऱ्यांनी दुष्काळग्रस्त भागांमध्ये चांगला पाऊस कधी पडेल, असा प्रश्न विचारला होता. यावर रामचंद्र साबळे यांनी सांगितले की, गेल्या ३० वर्षांच्या अभ्यासानुसार, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये या भागांत ९ ते १० वेळा जोरदार पाऊस पडतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करू नये.