Weather Report Maharashtra : स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर राज्यात पावसाचे पुनरागमन होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, १५ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहेत. विशेषतः कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील २९ जिल्ह्यांना पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहेत.
१५ ऑगस्ट रोजी राज्यातील हवामान स्थिती
राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले असले तरी, आता पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. १५ ऑगस्ट रोजी विविध विभागांमध्ये हवामानाची स्थिती खालीलप्रमाणे असेल:
- कोकण: मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
- मध्य महाराष्ट्र (पश्चिम महाराष्ट्र): पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मात्र, पुणे, कोल्हापूर आणि सातारा येथील घाटमाथ्यांवर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, या भागांनाही ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
- मराठवाडा: छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. लातूर आणि धाराशिवमध्ये मात्र हलका पाऊस अपेक्षित आहे. मराठवाड्यातील या जिल्ह्यांतही ‘यलो अलर्ट’ लागू आहे.
- उत्तर महाराष्ट्र: नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहमदनगर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. नाशिकच्या घाटमाथ्यावरही जोरदार पावसाची शक्यता आहे.
- विदर्भ: या विभागात अनेक जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे. नागपूर, अकोला, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर भंडारा, गोंदिया, वर्धा आणि यवतमाळमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस अपेक्षित आहे. बुलढाणा आणि वाशिममध्ये मात्र पावसाची शक्यता कमी असून, येथे आकाश निरभ्र राहील.
नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन
पावसाच्या जोरदार सरी, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्याच्या शक्यतेमुळे नागरिकांनी सतर्क राहावे. विशेषतः शेतकऱ्यांनी शेतातील कामांचे नियोजन काळजीपूर्वक करावे. हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षितता बाळगणे आवश्यक आहे.