Toll Rule : टोल नाक्यांवरून नियमित प्रवास करणाऱ्या कारचालकांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आलेली आहे. केंद्र सरकारने बिगर व्यावसायिक चारचाकी वाहनांसाठी (Car) एक मोठी सवलत जाहीर केलेली असून, आता तुम्ही फक्त ₹३,००० मध्ये वर्षभरात २०० हेलपाटे टोल-मुक्त करू शकतात. ही सवलत १५ ऑगस्टपासून लागू होणार आहेत.
सवलत कोणाला आणि कशी मिळेल?
गेल्या दोन महिन्यांपूर्वी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या सवलतीची घोषणा केली होती, आणि आता स्वातंत्र्य दिनापासून तिची अंमलबजावणी सुरू होत आहे.
- पात्रता: ही सवलत केवळ बिगर व्यावसायिक (Non-commercial) कार चालकांसाठी आहे. व्यावसायिक वाहनांना (Commercial Vehicles) याचा लाभ मिळणार नाही.
- सवलतीचे स्वरूप: एकदा ₹३,००० भरल्यानंतर, तुम्ही वर्षभरात देशभरातील कोणत्याही टोल नाक्यावरून २०० हेलपाटे मारू शकता. महत्त्वाचे म्हणजे, यासाठी २४ तासांची मर्यादा असणार नाही.
- सवलतीचा लाभ: सध्याच्या नियमांनुसार, ज्या टोलवर जाताना ₹७५ लागतात, तिथे २०० हेलपाट्यांसाठी ₹११,००० पेक्षा जास्त खर्च येतो. या नव्या सवलतीमुळे कारचालकांची किमान ₹८,००० ची बचत होणार आहे.
सवलत मिळवण्यासाठी काय करावे?
या सवलतीचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर एक ॲप डाउनलोड करावे लागेल.
- तुमच्या अँड्रॉइड मोबाईलमधील प्ले स्टोअरवर जा.
- ‘Rajmarg Yatra – Nhai’ हे ॲप डाउनलोड करा.
- ॲपमध्ये तुमच्या वाहनाची नोंदणी (Login) करा.
- तुमचा वाहन क्रमांक टाका.
- ₹३,००० चा रिचार्ज करा आणि सवलतीचा लाभ घ्या.
सोलापूर-पुणे महामार्गाचे प्रकल्प संचालक राकेश जवादे यांनी दिलेल्या माहितीनुसार, केवळ सोलापूर जिल्ह्यामध्ये सुमारे दोन लाख कारचालकांना या सवलतीचा फायदा होऊ शकतो. टोलचे नियम अधिक सोपे झाल्यामुळे नियमित प्रवास करणाऱ्यांना मोठी सोय होणार आहे.